सध्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून आता राजकारणात आणखी मोठ्या हालचालींची शक्यता आहे . दरम्यान आता एका मोठ्या नेत्याने एक अत्यंत मोठा दावा केला आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील देखील काही नावांची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, असा मोठा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असं राऊत स्पष्टपणे म्हणाले. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100 टक्के बावनकुळे यांचा विचार आणि शिफार, स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील, हे माझं आकलन आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील. जो राज्य योग्य दिशेने पुढ घेऊन जाईल आणि जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणीही व्यक्ती असेल, तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.
मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाहीयोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे, असं राऊतांनी सांगितलं.
संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून दिल्लीत काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.