प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या देवखेळ या सिरीज वरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सीरिज विरोधात कारवाईचे निर्देश दिले असून या ’ सीरिजचा वाद थेट विधानसभे पर्यंत पोहचला आहे.
कोकणातल्या ‘शंकासूर’ प्रथेवरून एका काल्पनिक कथा रचत ‘देवखेळ’ ही वेब सीरिज फेब्रुवारी 2026 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. मात्र या सीरिजवरून तेव्हा वाद निर्माण झाला होता. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजवर कोकणातल्या स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता हा वाद विधानसभेतही पोहोचला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या सीरिजविरोधात कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर काढून टाकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या वेब सीरिजमध्ये असं नेमकं आहे तरी काय आणि त्याला इतका विरोध का होत आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..
‘देवखेळ’ला इतका विरोध का?
कोकणातील शंकासूर प्रथेचा धागा पकडून अंधश्रद्धेमुळे काय काय घडू शकतं, याची थरारक कथा ‘देवखेळ’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे या पौराणिक आणि खूप जुन्या हिंदू लोककलेचं या सीरिजमध्ये विपरित चित्रण केल्याचं आणि लोककलेतील शंकासूर या दैवताचं अपमानकारक चित्रण केल्याचं कोकणातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. यामुळेच या वेब सीरिजला कोकणातून तीव्र विरोध करण्यात आला. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे ही अत्यंत लोकप्रिय आणि पौराणिक लोककला आहे. या लोककलेला सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवतांशी या लोककलेचा थेट संदर्भ असल्याने त्याला धार्मिक दृष्टीने एक पावित्र्य आणि अधिष्ठान प्राप्त झालं आहे. ‘देवखेळ’ या वेब सीरिजमुळे या पौराणिक आणि खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.