गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. दरम्यान आता बाहेरदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांसोबत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्हिएतनाममधून मोठी बातमी समोर आली आहे. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या स्पीडबोटीला भीषण अपघात झाला. समुद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बोट उलटली आणि त्यामधील सर्व प्रवासी पाण्यात फेकले गेले. या दुर्घटनेत 15 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
हनोई येथील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, फु क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.
भारतीय दूतावासाने या घटनेबाबत सांगितले की, या अपघाताचे नेमके कारण आणि बोटीत किती प्रवासी होते, याची अचूक माहिती गोळा करण्यात येत आहे. प्रभावित कुटुंबीयांना मदत करण्यासाठी हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार या बोटीत 33 भारतीय पर्यटक होते, यातील 15 जणांच्या मृत्यूची भीती वर्तवण्यात आलेली आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती किंवा मदतीसाठी भारतीय वाणिज्य दूतावासाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच हनोई येथेही स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, दुर्घटनेशी संबंधित मदत आणि चौकशीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.