नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भावली डॅम परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर हल्ला करुन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.या गुन्ह्यातील काही आरोपी हे अद्याप फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, की नाशिक शहरातील रहिवासी असलेले एक कुटुंब भावली डॅम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. धबधबा पाहत असताना दोन अनोळखी मुलांनी महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीची सोनसाखळी व मोबाईल हिसकावून घेतले. त्यावेळी पीडित दाम्पत्य आणि आरोपींमध्ये वाद निर्माण होऊन आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. फिर्यादी कुटुंबासह नाशिककडे निघाल्या असता आरोपींनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी व लाकडी दांडक्याने त्यांच्या कारच्या काचा फोडून जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित तपासाची चक्रे फिरवीत नऊ संशयितांना ताब्यात घेतले.
विशाल मच्छिंद्र भटाटे (वय 27), अनिकेत गणेश मानवेढे (वय 24), अनिरुद्ध विठोबा भागडे (वय 25), सागर ऊर्फ लोकेश गोकुळ गिते (वय 22), विनोद लक्ष्मण बोराडे (वय 26), सचिन दत्तू आडोळे (वय 29), अर्जुन चिंधू आडोळे (वय 25), देवीदास कचरू भगत (वय 25) व अजय भूषण दालभगत (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे इगतपुरी तालुक्यातील रहिवासी असून, यातील काही जण सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्याचे साथीदार कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू व इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कारवाई केली.