नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे महत्त्वपूर्ण आदेश सोमवारी (२९ जून) जारी करण्यात आले. जनहित, प्रशासकीय कार्यक्षमता आणि मनुष्यबळाचा प्रभावी वापर या बाबी लक्षात घेऊन या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत जनहित आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्तालय स्तरावरील मान्यतेनंतर एकूण १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आनंदा वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली राहुल पाटील यांची उरण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न असलेले पोलीस निरीक्षक सुरज ज्ञानदेव पाटील यांची खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे यांच्याकडे न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती बाळासाहेब देशमुख यांची कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा रघुनाथ कुंभार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन शंकर कदम यांची गुन्हे शाखेच्या एएचटीयू विभागात बदली करण्यात आली असून गुन्हे शाखेतील चेतनाराज चौधरी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जारी केलेल्या आदेशात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने हजर राहून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.