NEET पेपरलीक आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत व्यापक आंदोलन होत आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब आणि हरियाणातून शंभु बॉर्डरकडे कूच केली आहे. तर दुसरीकडे जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. परवा विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीत आंदोलनांचं सत्र सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी CRPF च्या 20 तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व तुकड्या पश्चिम बंगालमधून बोलावण्यात आल्या आहेत. तर दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गृह मंत्रालयाने (MHA) काल मंगळवारी रात्री राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीआरपीएफ जवानांची तात्काळ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) या 20 तुकड्या या विमानाने राजधानी दिल्लीत दाखल होतील. सीआरपीएफचे हे जवान पश्चिम बंगालमधून दिल्लीत येणार आहेत. सुरक्षेशी संबंधित अधिकृत सूत्रांनी PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, CJP चे आंदोलन, विविध राजकीय पक्षांचे आंदोलनं, दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या सर्व घडामोडी पाहता दिल्लीची कायदा आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी CRPF च्या एकूण 20 कंपन्या कोलकत्ता येथून दिल्लीत आणण्यात येणार आहे. सध्याची आंदोलनं, पोलिसांवरील हल्ले आणि पोलिसांकडून आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज यामुळे दिल्लीत वातावरण तापलेले आहे. विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता पाहता सरकारने सुरक्षेसाठी या 20 तुकड्या दिल्लीत आणण्याचा आदेश दिला आहे.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, या कंपन्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी तिथे पाठवण्यात आले होते. निवडणुकीनंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सीआरपीएफच्या या तुकड्या तिथेच तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा दिल्लीत परत बोलावण्यात आले आहे.
CRPF च्या एका कंपनीत जवळपास 100 जवान असतात. सध्या 20 कंपन्या बोलावण्यात आल्या आहेत. म्हणजे कोलकत्ता येथून सरकारने 2000 जवानांना दिल्लीत बोलावले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) विरोधात सुरू असलेले आंदोलन, 20 जुलै रोजीपासून सुरु झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन पाहता मजबूत सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना CRPF आणि त्यांची दंगा नियंत्रक पथकाच्या (RAF) जवळपास 30 कंपन्या उपलब्ध करून दिल्या आहेत.