सध्या राज्यसह देशातील राजकरणात मोठया हालचाली सुरु असून आरोप प्रत्यारोप आणि विविध दावे ह्या विविध खेळी असुरुचं असतात. दरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारबाबत अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे २०२९ आधीच आपापल्या पदांवरून पायउतार होतील, असा दावा राऊतांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे दिल्लीपासून ते महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात खरोखरच काही राजकीय उलथापालथ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नांदेडला पोहोचलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करतानाच त्यांनी केंद्रातील सत्तेवर जोरदार निशाणा साधला. हे माझे कोणतेही अंदाज किंवा भाकीत नसून मी देशातील खरी परिस्थिती मांडत आहे, हे सरकार २०२९ पर्यंत टिकणारच नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गावरून गडकरींवर निशाणा: मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्यामुळे मला अत्यंत लाज वाटते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, गडकरी साहेब, ही वेळ का आली, याचे उत्तर आधी शोधा! हा मार्ग का रखडला? याचे मुख्य कारण म्हणजे कंत्राटदार (ठेकेदार) आहेत. आणि हे कंत्राटदार नेमके कोण आहेत? तर ते तुमच्याच पक्षातील नेत्यांचे आणि मंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत.
सरकारविरोधातील असंतोष आज महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये आणि देशपातळीवर तीव्र आंदोलने सुरू आहेत. आता तर सरकारी कर्मचारी आणि शिक्षकही सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हा एक प्रकारे या सरकारच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचा संकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत; हे माझे केवळ भाकीत नसून मी मांडलेले जळजळीत सत्य आहे, असे संजय राऊत म्हणाले
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी (Collector), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) आणि पोलीस अधीक्षक (SP) यांच्या कार्यालयात १५ ते २० हजार रुपयांच्या मानधनावर खासगी तरुणांची नियुक्ती केली आहे. हे तरुण थेट मुख्यमंत्र्यांना (CM) रिपोर्ट करतात. प्रशासकीय यंत्रणेवर अशा प्रकारे खासगी माणसे बसवणे म्हणजे आपल्याच अधिकाऱ्यांवर 'हेरगिरी' (गुप्तहेरगिरी) करण्याचा प्रकार आहे. आणि आपल्याच माणसांवर अविश्वास दाखवून हेरगिरी करणे, ही तर भाजपची जुनी परंपराच आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.