द्वारका चौक, त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग
द्वारका चौक, त्र्यंबक रस्त्याचा एक मार्ग "या" तारखेपर्यंत सुरू करण्याचे निर्देश
img
दैनिक भ्रमर
नाशिक : शहरातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि यांनी सोमवारी द्वारका चौक, मुंबई नाका आणि त्र्यंबक रस्त्याची पाहणी केली. द्वारका चौकातून नाशिक-धुळे मार्गावरील वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत सुरू करावी, तसेच त्र्यंबक रस्त्यावरील एक मार्गही ३१ ऑगस्टपर्यंत खुला करावा, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. मुंबई नाका ते गडकरी सिग्नल आणि पुढे खडकाळी सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचा एक मार्ग काम तातडीनी हातात घेऊन नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्याचेही निर्देश देण्यात आले.
या पाहणीवेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बारवकर, प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त (परिमंडळ १) मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी तसेच एमएसआयडीसी, महापालिका, एसटी महामंडळ आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

द्वारका चौकात पाहणी
द्वारका चौकातील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना एमएसआयडीसीने ३१ ऑगस्टपर्यंत नाशिक-धुळे दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश शेखर सिंह यांनी दिले. या कामाचा शहराच्या वाहतूक व्यवस्थेला दीर्घकालीन फायदा होणार असला, तरी काम सुरू असताना नागरिकांना होणारा तात्पुरता त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्यात येणार आहे. कंत्राटदार, संबंधित विभाग आणि पोलिस यांच्यात समन्वय ठेवून या वॉर्डनचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.

मुंबई नाका परिसरातही पाहणी
मुंबई नाका येथून गडकरी सिग्नलमार्गे खडकाळी सिग्नलपर्यंतच्या रस्त्याचीही पाहणी करण्यात आली. नवरात्रोत्सवापूर्वी या मार्गाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
त्र्यंबक रस्त्यावरील मुंबई नाका ते एबीबी सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. रस्त्यावरील पॅचवर्कची कामे पूर्ण करून ३१ ऑगस्टपर्यंत एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश देण्यात आले. पर्यायी बाजूच्या रस्त्यावर होणारी वाहतूक वाहतूक वॉर्डनच्या मदतीने नियंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

“शहराच्या दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थेसाठी ही कामे आवश्यक आहेत. मात्र, कामांमुळे नागरिकांना होणारा तात्पुरता त्रास कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संबंधित यंत्रणांना स्पष्ट कालमर्यादा देण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यावर भर आहे,” असे शेखर सिंह यांनी सांगितले.
“पायाभूत सुविधांची कामे आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करून रस्त्याचे मार्ग खुले करावेत. तसेच खड्ड्यांसारख्या तातडीच्या समस्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्यात येइल,” असे मनीषा खत्री यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group