राज्यात धोक्याची घंटा ! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा, हवामान विभागाचा  इशारा
राज्यात धोक्याची घंटा ! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा, हवामान विभागाचा इशारा
img
Nandini khandare More
 


गेल्या काही दिवसांनपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल होत असून राज्यात दुहेरी वातावरण बघायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहेतर काही ठिकाणी मात्र उष्णतेने कहर केला असून आता राज्यावर उष्णतेच संकट आले आहे. यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान आता  काल तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. उष्णतेने कहर केला. पुढील दोन दिवस राज्यातील तीन जिल्ह्यांना अतितिव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला. विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरणही मिळतंय. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुढील दोन दिवस या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि गोदिंया या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. 

मात्र, दुसरीकडे रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान ,आज भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. नागरिकांनी शक्यतो दुपारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. गोंदिया जिल्ह्यात 44 ते 45 अंशावर तापमान आले असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना पुढे येत आहेत.

भंडारा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक लस्सी, लिंबू सरबत व अन्य शीतपेयांच्या दुकानांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत चढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group