दैनिक भ्रमर : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने जोरदार थैमान घातले आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत झालेल्या पावसामुळे काही शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. त्यात पुढील दोन दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता असून लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. या बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. समुद्राला संध्याकाळी साडे सहा वाजल्यानंतर भरती येणार आहे, त्यामुळे पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुढील ११ ते १२ तास तीव्र पाऊस मुंबईत होऊ शकतो. दुपारी ४ नंतर लोकांना मंत्रालयातून जाण्याची परवानगी देत आहोत. संध्याकाळी ६. ३० नंतर हायटाईड आहे. त्यामुळे लोकांनी देखील काळजी घ्यावी. मुंबईतील संभाव्य पावसाच्या धर्तीवर पालिकेनं देखील तयारी केली आहे. जे अलर्ट संध्याकाळी येतील त्या आधारे शाळेसंदर्भात निर्णय होईल." पावसामुळे लोकल ट्रेन बंद झाल्या नाहीत, मात्र स्पीड कमी झाला आहे. ट्रेन लेट आहेत पण थांबल्या नाहीत.