पावसाचा जोर वाढला...! राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ जारी
पावसाचा जोर वाढला...! राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ जारी
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई-ठाणे परिसरासाठी पुढचे ४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, पुण्यासाठी पुढील १२ तासांसाठी हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

राज्यात तीन चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव, मान्सूनची तीव्र सक्रियता आणि दमदार ढगांच्या घनतेमुळे अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

राज्यात पावसाचा जोर वाढला, पुढील ४ दिवस मान्सून सक्रिय 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ जून ते २२ जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विशेषतः कोकणात वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटाचा अंदाज आहे, तर घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक जाणवेल.
 
जिल्हानिहाय हवामान अलर्ट

कोकण विभाग : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईतही जोरदार सरी संभाव्य आहेत. २०-२२ जूनदरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित.

घाटमाथा व पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांत १९ जूनला अति मुसळधार पाऊस, विजांच्या गडगडाटासह वाऱ्यांचा वेग ५० किमी पर्यंत पोहोचू शकतो.

मध्य महाराष्ट्र : अहिल्यानगर, सांगली, सोलापूर भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. काही भागांत वीज पडण्याची शक्यता.

मराठवाडा : लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, जालना जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस, १९ आणि २० जून रोजी वादळी वाऱ्यांची शक्यता.

विदर्भ : अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत ३०-४० किमी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जना, १९-२२ जून दरम्यान पावसाचा जोर राहणार.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group