गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यात धुमाकूळ घालणार असल्याचे संकेत आहेत. याच पार्श्वभूमीवर 13 जूनसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज, यलो आणि रेड अलर्ट जारी केले आहेत.
दरम्यान , रत्नागिरीला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर हा सर्वात जास्त असणार आहे. पाहुयात 13 जून रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर तळकोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, अहिल्यानगर, धुळे या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.