राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा जोर धरणार आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडणार असून हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात १४ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने वर्तवला दिलेल्या अंदाजनुसार , राज्यात ११ ते १४ जुलै या कालावधीत पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढचे ४ दिवस राज्यासाठी महत्वाचे असून रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र १५ जुलैपासून राज्यातील पाऊस कमी होणार आहे.