पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटला गेलाय. दहशतवाद्यांना पोसत नाही, दहशतवाद्यांना पोसत नाही म्हणणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळाला टार्गेट केले होते. भारताच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दहशतवाद्याच्या कुटुंबियाला मदत करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सरसावलाय.
दुबईत रविवारी आशिया चषकाचा हाय व्होल्टेज अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारताने पाच विकेटने विजय मिळवत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. आशिया चषकात भारताने लागोपाठ तीन सामन्यात पाकिस्तानची जिरवली. पहलगाम हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानच्या खेळाडूसोबत संपूर्ण स्पर्धेत कोणताही संबंध ठेवला नाही. शेकहँड, फोटोशूट, ट्रॉफी घेण्यापासूनही भारताने नकार दिला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या चेहऱ्यावर हा राग दिसत होता.
सामन्यानंतर सलमान आगा याने मोठी घोषणा केली. फायनल सामन्यासाठी मिळणारी संपूर्ण रक्कम ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. सलामान आगाच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानवर टीकेची झोड उठली आहे. भारताने केलेल्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना फायनल सामन्याची फीस पाकिस्तानचा संघ देणार असल्याचे सलमान आगा याने सांगितले.
आशिया चषक फायनल सामन्याची फीस संपूर्ण संघ भारताच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या लोकांना आणि मुलांच्या कुटुंबियांना दान करत आहोत, असे पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा म्हणाला. दुबईत तो पत्रकारांशी बोलत होता. या वेळी आगा याने भारतीय संघावरही निशाणा साधला. भारताने आमच्यासोबत ते केले ते चुकीचं होतं, त्यांनी क्रिकेटचा अपमान केला, असे आगा म्हणाला.