आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची मोठी लाट बॉक्स ऑफिसवर पसरली आहे. हा चित्रपट प्रोपेगेंडाचा असल्याचा आरोप अनेकाकांडून करण्यात येत आहे. तरीसुद्धा या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने 900 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
दरम्यान, प्रोपेगेंडाचा आरोप झालेला असाच एक चित्रपट फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता ‘धुरंधर 2’च्या लाटेचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. या चित्रपटावरून बराच वाद झाला होता आणि हा वाद कोर्टापर्यंतही पोहोचला होता. या चित्रपटाचं नाव आहे ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’.
‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात फक्त 60 लाख रुपयांची कमाई केली. ‘धुरंधर 2’च्या लाटेत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत फक्त 42.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचा बजेट 28 ते 30 कोटी रुपये असल्याने त्या तुलनेत चित्रपटाने बरी कमाई केली आहे.
‘द केरळ स्टोरी’च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या भागाने 6.75 कोटी रुपयांनी ओपनिंग केली होती आणि जगभरात या चित्रपटाने 220 कोटी रुपये कमावले होते.