26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देत हिरो ठरलेला माजी एनएसजी कमांडो गोत्यात आला आहे. राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि अंमली पदार्थविरोधी कार्यदल (ANTF) यांनी बजरंग सिंग यांना अटक केली आहे. ते गांजा तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी घोषित केलं आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री चुरु येथून सुमारे 200 किलो गांजासह बजरंग सिंग यांना अटक करण्यात आली.

बजरंग हा ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजा आणून राजस्थानमध्ये त्याचे नेटवर्क चालवत होता. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.पोलीस पकडू नये यासाठी बजरंग मोबाईल फोन फार कमी प्रमाणात वापरत असे. तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर राजस्थानच्या एटीएसने त्याला अटक केली.
बजरंगचा निर्भड स्वभाव आणि ओडिशा-तेलंगणा राज्यातील संपर्कांमुळे त्याने राजस्थानमध्ये नेटवर्क तयार केले होते, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली. विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगने छोट्या व्यवहारांपासून ते क्विंटल आकाराच्या अंमली पदार्थाची तस्करी केली. त्याच्या अटकेमुळे राजस्थानमधील गांजाच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त होण्यास मदत होईल.
बीएसएफमध्ये सामील होण्यासाठी बजरंग सिंगने शिक्षण सोडले. कुस्तीगीरासारखी शरीरयष्टी आणि लढाऊ वृत्तीमुळे तो एनएसजी कमांडो बनला. बजरंगने सात वर्षे दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये भाग घेतला होता. २००८ च्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान एनएसजीच्या ताज हॉटेल ऑपरेशनमध्ये तो सहभागी होता. २०२१ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. गावी परतल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर बजरंगने त्याच्या पत्नीला गावप्रमुख म्हणून उभे केले. यादरम्यान तो गुन्हेगारांशी जोडला गेला, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.