महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना विरार मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या चार मजली इमारतीमध्ये बारा कुटुंब राहत होती. त्यापैकी नऊ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर २० ते २५ जण इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्याची भीती व्यक्त होत आहे.
रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे. दहा वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते. रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू केले.घटनास्थळी वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोधकार्य सुरु आहे.
हे ही वाचा
मदतकार्य पोहोचवण्यास अडथळा
दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिकांनी ही इमारतखाली केली नव्हती. पालिकेकडून अनेकदा यासंदर्भातील नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत मध्यभागी आहे आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चाळी असल्याने मदतकार्य पोहोचवण्यास अडथळा निर्माण होतोय. मोठे जेसीबी तिथे पोहोचू शकत नसल्याने मलबा काढणे अवघड झाले आहे.
हे ही वाचा
बर्थडे गर्लसह आईचा दुर्दैवी अंत
रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत जोयल कुटुंबातील एक वर्षीय चिमुरडीचा पहिलाच वाढदिवस होता. त्यानिमित्ताने परिसरातील आणि मित्र परिवार सर्वजण घरी एकत्रित जमले होते. मात्र अचानक ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत या वाढदिवसाच्या दिवशीच चिमुरडीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या आईचाही मृत्यू झाला आहे.