राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पीक विम्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने फळपीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
हवामान आधारित फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेत शेतकरी 6 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
या योजनेंतर्गत मृग बहार 2025 मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. '=
याआधी अर्ज करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांना अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता योजनेला मुदतवाढ मिळाली आहे. आता इच्छुक शेतकऱ्यांना 6 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या www.pmfby.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेत अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. फार्मर आयडी असेल तरच या योजनेत अर्ज करता येणार आहे. फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांनी वेबसाइटवरून आधी आयडी काढून घ्यावा. आयडी मिळवण्यासाठीची प्रक्रियाही सोपी आहे. त्यानुसार कार्यवाही करुन फार्मर आयडी काढून घ्यावा.