कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील जंतर- मंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी ने ''शाळा दुरुस्त करा'' हे अभियान सुरु केले असून जयपूर जिल्ह्यातील रामपुरा गावात शाळा पाहणीसाठी गेलेल्या सीजेपी कार्यकर्त्यांवर भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. या हल्ल्यात सीजेपीचे कार्यकर्ते आशुतोष रांका यांना बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. एका कार्यकर्त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचेही दीपके यांनी सांगितले.
दीपके यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडली असून, राजस्थान पोलिसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी या घटनेला राजस्थानच्या लोकशाहीतील काळा दिवस असे संबोधले. सरकारचे अपयश दाखवल्यास भाजपचे गुंड हल्ले करतात, परंतु आपण घाबरणार नाही, असे दीपके यांनी स्पष्ट केले. अभिजीत दीपके यांनी आगामी निवडणुकीत भाजपाची गुंडागर्दी संपवून टाकू, अशी प्रतिज्ञा केली. शाळा दुरुस्त करा हे आपले अभियान यापुढेही सुरूच राहील. ते म्हणाले की, हे हल्ले आपल्याला थांबवू शकणार नाहीत आणि ते स्वतः राजस्थान दौरा करणार आहेत.