मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीची कारवाई;  लाच घेताना क्लर्कला अटक
मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीची कारवाई; लाच घेताना क्लर्कला अटक
img
वैष्णवी सांगळे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबईतील मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका कार्यालयात गुरुवारी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे.एसीबीने सापळा रचून लाचखोर क्लर्कला ताब्यात घेतलंय. मंत्रालयातील एका कार्यालयात ५० हजारांची लाच घेताना क्लर्कला अटक करण्यात आली आहे. 

महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात झालेल्या लाचखोरीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं म्हणत काँग्रेसने टीका केली आहे. या घटनेनंतर लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.दरम्यान, थेट मंत्रालयातील एका कार्यालयातच क्लर्क अशा प्रकारे लाच घेताना आढळून आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं?
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका कार्यालयामध्ये एसीबीने गुरुवारी छापा टाकला. यावेळी लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग हे ३५ हजारांची लाच स्वीकारत असताना रंगेहात आढळून आले. एका रद्द परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. पण त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री झिरवाळ यांचे स्पष्टीकरण
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका लिपिकावर एसीबीने केलेल्या कारवाईनंतर मंत्री झिरवाळ यांच्याशी संपर्क साधला असता, आपण सध्या दिल्ली दौऱ्यावर आहोत. माझ्यासोबत माझे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी आहेत. माझ्या मंत्रालयातील कार्यालयात छाप्याच्या घडलेल्या प्रकाराची मला काही कल्पना नाही. तसेच आपला त्याच्याशी सुतराम संबंध नाही, असे मंत्री झिरवाळ यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहायक यांनी सांगितल. 

यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर मोठं भाष्य करत थेट संबंधित कॅबिनेट मंत्र्यांला पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की , “मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group