तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच कारवाईचा धडाका लावला आहे. दरम्यान तुकारम मुंढे यांनी आता आपला मोर्चा हा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. ग्राहकांपर्यंत शुद्ध आणि भेसळमुक्त दूध पोहोचावे, यासाठी लवकरच दूध उत्पादक, विक्रेते आणि वितरण साखळीतील सर्व घटकांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभरातील अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थ निर्मिती केंद्रे आणि भेसळीचा संशय असलेल्या ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. याशिवाय राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधातही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता.
दरम्यान, आता त्यांनी दुधातील भेसळीच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे. “ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध पोहोचणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे,” असे स्पष्ट करत भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात दूध उत्पादक आणि संबंधित घटकांची बैठकही घेण्यात आली आहे. नव्या नियमांच्या कक्षेत दूध संकलन केंद्रे, दूध शीतकरण केंद्रे, दुग्ध प्रक्रिया युनिट्स, उत्पादक, वितरक, वाहतूकदार, घाऊक व किरकोळ विक्रेते यांचा समावेश असणार आहे.
याशिवाय पनीर, खवा, तूप, दही, चीज आणि दूध पावडर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांनाही हे नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली. या निर्णयामुळे दुधातील आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.