शिर्डीच्या साईमंदिरात भाविक हजारोंच्या संख्येने दररोज येत असतात. देशभरात प्रसिद्ध असलेल्या साई मंदिरातून भाविक मोठ्या श्रद्धेने प्रसाद घेतअसतात. मात्र आता साई मंदिर परिसरातील धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.
शिर्डीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा मोठी कारवाई करत साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर धाडसत्र राबवले आहे. या कारवाईदरम्यान निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिक पेढे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या पेढा व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. साई मंदिर परिसरातील खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
दबंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यातील भेसळखोरी विरोधात कडक पावले उचलली आहेत. शिर्डीच्या साई मंदिर परिसरात खाजगी दुकानदार प्रसादाच्या नावाखाली भाविकांना अतिशय निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री करत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या अशा घटकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर अहिल्यानगरच्या पथकाने शिर्डीत धडक धाडसत्र सुरू केले आहे. गेल्या अवघ्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा प्रसादाची दुकाने आणि उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकण्यात आला आहे. काल दिवसभर एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांनी शिर्डीत हे धाडसत्र राबवले. या कारवाईत तब्बल 650 किलोहून अधिक वजनाचा निकृष्ट पेढा जप्त करण्यात आला आणि तो कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आला. या नष्ट करण्यात आलेल्या पेढ्यांची बाजारातील किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण आणि धडक कारवाईमुळे शिर्डी परिसरातील भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आगामी काळातही हे धाडसत्र अधिक तीव्र केले जाईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.