मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं ; सरकारला दिला ९० दिवसांचा अल्टीमेटम
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं ; सरकारला दिला ९० दिवसांचा अल्टीमेटम
img
Nandini khandare More

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले २० दिवसांचे उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी उपचाराची आवश्यकता सांगितल्यानंतर जरांगे पाटील आता बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, जिथे त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले जातील.

 सरकारच्या शिष्टमंडळासोबत बीडमधील पाटोदा येथे झालेल्या सुमारे दीड तासांच्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. उपोषण स्थगित केले असले तरी मराठा समाजाचे आंदोलन पूर्णपणे सुरुच राहील, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

आज (१७ सप्टेंबर) पहाटे ५ वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांची भेट घेतली. प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत समाजाला संबोधित केले आणि मुंबईच्या दिशेने निघालेल्या १ लाखांहून अधिक समर्थकांना शांततेत माघारी परतण्याचे आवाहन केले.

दरम्यान, सरकारला दिलेली ९० दिवसांची मुदत संपण्यापूर्वी गॅझेटची अंमलबजावणी व ५८ लाख नोंदींच्या सुरक्षिततेचा जीआर काढला जातो का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “आरक्षणापेक्षा समाजाची इज्जत आणि स्वाभिमान महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे वैरी नाहीत, पण समोरून अन्याय झाला तर शांत बसणार नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी; जर सरकारने मराठा समाजाला धोका दिला, तर आम्ही पुन्हा मुंबई गाठू, असेही त्यांनी सांगितले.


मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “जरांगे यांच्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या होत्या. एका मागणीबाबत काही कायदेशीर व प्रशासकीय अडचणी आहेत, ज्या लवकरच सोडवल्या जातील. मराठा समाजाला जे काही मिळाले आहे, ते आमच्या सरकारच्या काळातच मिळाले आहे. आगामी सणांच्या काळात मुंबईतील सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता उपोषण मागे घेतले गेले, हे सकारात्मक आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group