भोंदुबाबा खरात प्रकरणी केसरकरांचा खुलासा, आरोपांवर म्हणाले कॅप्टन खरात...
भोंदुबाबा खरात प्रकरणी केसरकरांचा खुलासा, आरोपांवर म्हणाले कॅप्टन खरात...
img
वैष्णवी सांगळे
नाशिकच्या भोंदुबाबा अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. त्यांनी दीपक केसरकर यांचे नाव घेत अशोक खरातप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता दीपक केसरकर यांनी समोर येत राऊतांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.



संजय राऊत यांचा आरोप
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की,  दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना शिक्षण खात्यातील अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या, इतर कामं करताना हे अशोक खरात बाबा लक्ष घालायचे. अनेक अधिकाऱ्यांची बदली, बढती करण्यासाठी हे बाबा दीपक केसरकर यांना सांगायचे. ट्रायटन्ट हॉटेलमध्ये बोलवून ही सगळी कामे करून घेतली जायची. शिक्षण खातं हे खरात बाबाकडून चालवले जायचे, असा गंभीर स्वरुपाचा आरोप संजय राऊत यांनी केला.

दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण 
दीपक केसरकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कॅप्टन खरात यांना ज्या गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे, त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच कॅप्टन खरात यांच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही, तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमची भेट झाली होती, असेही केसरकर यांनी सांगितले. खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र/ज्योतिषशास्त्र) मध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी केवळ त्या विषयापुरती ओळख आहे. समाज माध्यमांवर फिरत असलेले फोटो हे ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातील किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या निमंत्रणावरून लग्नाला जाणे किंवा शुभेच्छा देणे हा सामाजिक शिष्टाचार आहे, असे सांगत त्यांनी या फोटोांचा वैयक्तिक प्रकरणांशी संबंध जोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झाले असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची प्रसिद्धी देऊ नये, असे केसरकर म्हणाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group