जमिन खरेदीच्या एका व्यवहारामुळे महाराष्ट्र्रात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. यामुळे राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी नियम वाकवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आलीय का असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर स्टॅम्पड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये भरल्याचेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशीही टीका अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टमधून केली आहे. त्यामुळे आता जमिनीच्या व्यवहारावरुन राज्यातील राजकीय वातावरणा चांगलेच तापण्याची शक्यता आहे.