१८०० कोटींचा जमीन घोटाळा सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजत आहे. पुण्यातील१८०० कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ ३०० कोटींमध्ये घेतली, तसेच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात ४० एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे आता उघडकीस आले आहे.
जमिनीचे प्रकरण आता शेकण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडण्याच्या हालचाली अजित पवारांकडून सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवसभरात दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून हे प्रकरण शांत करण्याची तयारी सुरु केली आहे. पार्थ पवार ही जमीन सरकारकडे परत देऊन राज्यभरात तापत चाललेले प्रकरण शांत करण्याची शक्यता आहे.
अजित पवार, पार्थ पवार यांच्याविरोधात आंबेडकरी संघटनांकडून आंदोलने सुरु झाली आहेत. यामुळे हा जमीन घोटाळा निवडणुकांच्या तोंडावर शेकू नये म्हणून अजित पवारांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. हल्लीच्या काळातील हा भाजप प्रणित महायुतीचा दुसरा मोठा जमीन घोटाळा आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन घोटाळ्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आले होते.
यानंतर विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने या जमिनीचा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आला होता. आता त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच दुसरा मोठा जमिनी हडपण्याचा घोटाळा समोर आल्याने महायुतीला देखील हे प्रकरण अवघड झाले आहे. या प्रकरणातही जैन बोर्डिंग प्रकरण शांत करण्याचा जो रस्ता अवलंबण्यात आला तोच वापरला जाण्याची शक्यता आहे.