राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधन झाले. अजित पवार यांचे निधन हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला मोठा हादरा बसवणारे होते. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. अजित दादांच्या निधनांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. मात्र या शपथविधी सोहळ्यापासुन शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुर ठेवण्यात आल्याचं चित्र आहे.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनिल तटकरे, छगन भुजबळ ,प्रफुल पटेल, या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकुणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोलल्याच दिसून येतंय. काल बारामतीत अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या विधीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या. त्यानंतर दोघी वेगवेगळ्या दिशेने गेल्या. त्यानंतर राजकीय घडामोडींना मुंबईत वेग आला आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार यावर शिक्कामोर्तब झाले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांची शरद पवारांसोबत भेट झालेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी संवाद न साधल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चाला खोडा लागल्याचं बोललं जात आहे.
आता याचदरम्यान, आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठं भाष्य केलं आहे. शरद पवारांना सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवलं आहे, अजित पवारांना लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती होती. लोकांना न्याय देण्याचं काम अजित करत होता. दैनंदिन कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. आज हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलंय. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत.