अजित पवारांच्या निधनानंतर विमान अपघातावर जशी चर्चा सुरु आहे तशीच वेगाने चर्चा सुरु आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची. अपघातापूर्वी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या. याच बैठकातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती. १२ फेब्रुवारी ही तारीखही ठरण्यात आली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते करत होते. आता त्यातच आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
रोहित पवार काय म्हणाले ?
मला विलीनीकरणावर बोलायचं नव्हते. पण जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि अजितदादांची इच्छा दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची होती. भावनिक दृष्टीने ते विचार करत होते. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले असते. दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला भारी वाटते. त्यांच्या पत्रकार परिषद पाहिल्या तर त्यांना विलीनीकरणावर बोलायला फार आवडते. आम्हीच अजितदादांचा अपघात की घातपात या विषयावर बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे आहे त्यावर मी आज बोलले पाहिजे असं वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. अमोल कोल्हे हे संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, ती अजितदादांची इच्छा होती. अजितदादांच्या इच्छेप्रमाणे अमोल कोल्हे फार प्रामुख्याने पुढाकार घेत होते. अजितदादांना पक्ष वाढवायचा होता. अमोल कोल्हे यांनीही विलीनीकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे बोललेत. ज्यांच्या घरी बैठका झाल्या ते जयंत पाटील बोललेत. १३ बैठका झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज कुठून घ्यायचे हे सगळ्यांना माहिती आहे. मंत्री लोढा यांच्या घरासमोरचा सीसीटीव्ही बघा, दादा वेगवेगळ्या वाहनातून तिथे आले होते. जयंत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिले आहे असं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.