उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला तीन आठवडे उलटले आहेत. या दुर्दैवी घटनेभोवती संशयाचे धुके गडद होऊ लागले आहे. या अपघातानंतर अपघाताची चौकशी व्हावी यासाठी अनेकांनी जोरदार मागणी लावून धरली आहे. विमान अपघात हा एक नियोजित कट असण्याची शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. त्यातच रोहित पवार यांनी आता आणखी दोन ट्वीट करत याबद्दल अजून एक संशय व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केले आहे. यात त्यांनी सरकारकडे चौकशीची विनंती केली आहे. तसेच त्यांनी सरकारला अनेक सवाल करत VSR विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.
अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे.
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं?
देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.