राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवार यांना शेवटचा निरोप द्यायला राज्यभरातून हजारोंचा जनसमुदाय बारामतीत जमला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील आमदार, खासदार, मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भाजपावर टीका करत अजित पवार यांच्यावरील आरोपांविषयी मोठी मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.
संजय राऊत यांनी अजितदादांवर करण्यात आलेल्या ७० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.