कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील आरे गावात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. चिंध्यांनी बांधलेला झोपाळ्यात झोका घेत असताना एका चिमुकलाचा फास लागून मृत्यू झाला आहे. चिमुकल्याच्या दुर्देवी मृत्यूनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , खेळण्यासाठी मुलाने लाकडी जिन्याला चिंधी आणि पट्ट्यांपासून झोपाळा तयार केला होता. त्यावर हा चिमुकला खेळत होता. मात्र, हा खेळ त्याच्या आयुष्यातला अखेरचा ठरला.
या चिमुकल्याचे नाव समर्थ अरूण वरूटे (वय वर्ष ९) असे आहे. समर्थ चौथीच्या वर्गात शिकत होता. घटनेचा दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. शाळेत परिक्षा देऊन समर्थ घरी आला होता. दुपारी आई वडील कामावर गेले होते. तर, मोठा भाऊ अर्थव दुध आणण्यासाठी दुकानात गेला होता. समर्थ हा घरी एकटाच होता. खेळण्यासाठी मुलाने लाकडी जिन्याला एक झोपाळा तयार केला होता. झोपाळ्यावर झोका घेत असताना दोरी त्याच्या गळ्याला अडकली. त्याचा श्वाल गुदमरला आणि क्षणात समर्थने जगाचा निरोप घेतला.
भावाच्या डोळ्यासमोर भावाचा मृत्यू अर्थव घरी परतला तेव्हा त्याने हे दृश्य पाहिलं. त्याच्या पायाखालची जमिन सरकली. त्याने किंचाळत घराबाहेर धाव घेतली. त्याच्या आवाजाने शेजारी आणि परिसरातील इतर नागरिकांनी अर्थवच्या घराबाहेर धाव घेतली. समर्थला तातडीने सीपीआर रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरे गावातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.