आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे. त्यातच आता गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकल्याचे बातमी समोर येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला.
त्यानंतर थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत. मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचले नाही, मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली आहे. पुढील काही वेळेत त्यांना सुरक्षित रितीने बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.