राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय !  ''या''  14 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय ! ''या'' 14 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
img
नंदिनी मोरे
 5 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने इशारा जारी केला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो.

राज्याची राजधानी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश राहील, तर अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. तर मुंबईतील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस एवढे असेल. कोकण विभागामध्ये ढगाळ आकाश राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या घाट भागामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो, तर पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे कोरडे हवामान पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होऊ शकतो, तर नाशिक जिल्ह्याच्या घाटावर देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे, तर बीडमध्येही वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

विदर्भातील सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, उपराजधानी नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group