महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. त्याच दरम्यान आणखी एक बातमी समोर येत आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास अपेक्षेपेक्षा जलद असण्याची चिन्हं हवामान खात्याने व्यक्त केली आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ जून २०२५ च्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
सध्या दिलेल्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजांमुळे सध्या सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मान्सून लवकर आल्यास केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीवरून समजते की, १३ मेपासून अंदमान-निकोबार बेटसमूहावर नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्यासाठी हवामान पोषक होत आहे. यामुळे मान्सूनचा प्रवास वेळेआधी सुरू होणार असून, याचा परिणाम केरळ आणि महाराष्ट्रावरही होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा केरळमध्ये मान्सून २७ मे रोजीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही तारीख नेहमीच्या सरासरी तारखेच्या (१ जून) आधीची आहे.
केरळमध्ये मॉन्सून वेळेआधी दाखल झाल्यास, पुढील आठवड्यात म्हणजेच ६ जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रातही पोहोचण्याची शक्यता वाढते. राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मॉन्सूनचे वेळेवर आगमन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा वेळेवर आणि पुरेसा पाऊस होईल, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
हवामान खात्याने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात हळूहळू पावसाचे आगमन होऊ शकते. देशभरात शेतकरी, उद्योगधंदे आणि पाणीसाठ्यांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था मोसमी पावसावर खूप प्रमाणात अवलंबून असते.
त्यामुळे वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन हे अनेकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. लवकर पावसामुळे शेती हंगाम वेळेवर सुरू होईल, तर जलसाठ्यांमध्येही पाण्याची वाढ होण्यास मदत मिळेल.