सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरल्याने मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ झाली. आंदोलनाने इतकं हिंस्त्र वळण घेतलं की अगदी मंत्र्याची घरे जाळण्यापासून संसद पेटवण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. मंत्रिमंडळातील राजीनाम्यानंतर पंतप्रधान यांनीही राजीनामा दिला.यांनतर येथील सरकार कोसळलं.
राज्यकर्त्यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर येथील लष्कराने मंगळवारी रात्री १० वाजल्यापासून देशाचा कारभार हाती घेतल्याची घोषणा केली आहे. असं असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील परिस्थितीवर पहिली प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक बोलावली होती. मोदींनी नेपाळमधील शांततेवर भाष्य केलं आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये शांतता परतेल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. "आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबहून परतल्यावर, सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर चर्चा झाली. नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे," असं मोदींनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी, "अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे पाहून मला दुःख झाले आहे. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांततेला पाठिंबा देण्याचे नम्र आवाहन करतो," असंही म्हटलं आहे.