राज्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात गुरुवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या जावांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शिवाय हत्येनंतर त्या दोघींच्या अंगावरचे दागिने सुद्धा चोरण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज सायंकाळी ही घटना घडली. अंतकलाबाई अशोक आढागळे ( वय 55) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे(वय 45) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे माहूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी घटना घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, दोन्ही महिलेच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. हत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब असल्याने लुटमारीच्या उद्देशाने सदरील खून झाल्याची चर्चा आहे.
पोलीस या हत्येमागच्या आरोपीचा तपास घेत असून दुहेरी हत्याकांडामुले गावात खळबळ उडाली आहे. तसेच एकाच दिवशी घरातील दोन्ही सुनांचा मृत्यू झाल्याने आढागळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.