नांदेड : राज्यातील काही भागांत आजही पावसाने दमदार हजेरी लावली असून गेल्या 4 दिवसांतील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुठे पावसाच्या पाण्याचे शेतीचे नुकसान झालं आहे, तर कुठे वीज पडून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
त्यातच, नांदेड, लातूरमध्येही पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील गारगव्हान येथे खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे अशी मृत मुलांची नावे आहेत. नेवरी गावातील संघर्ष परघने हा लग्नासाठी मामाच्या गारगव्हाण या गावी आला होता. मात्र, मामाचं गाव त्याच्यासाठी काळ ठरलं. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला, असून गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दोघांच्या मृतदेह बाहेर काढण्याची शोधमोहीम हाती घेतली होती.
संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल वाढवे हे दोघे शेताकडे जात असताना पावसामुळे रस्त्यात चिखल झाला होता. चालताना दोघांपैकी एकाचा पाय घसरून तो खदानीत पडला, त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्र देखील या दुर्घटनेत बुडाला. या घटनेने गारगव्हान गावावर शोककळा पसरली आहे.