नांदेड : जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्याने 30 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, एसजीजीएस कॉलेज आणि नर्सिंग कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , यापैकी 31 विद्यार्थ्यांवर नांदेडच्या शासकीय रुग्णायलयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळं विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळं या परिसरात वसतिगृह आणि खासगी रुम घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या भागातील एका दुकानात बुधवारी रात्री अनेकांनी पाणीपुरी खाल्ली.
यानंतर विद्यार्थ्यांना रात्री उशिरा पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळं विद्यार्थ्यांना विष्णुपुरी इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. उपचारासाठी दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
पाणीपुरी खाल्यानं प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णायलात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व विद्यार्थी 22 ते 26 वयोगटातील आहेत. याबाबत प्रेस नोट जाहीर करून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कापसे यांनी दिली.