पुणे पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना उघड झाली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील उच्चभ्रू सिंध सोसायटीत एक भाऊ, बहिण आणि वृद्ध आईला घरातून जबरदस्तीने बाहेर काढून घर हडपल्याची धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने चार बाऊन्सरच्या मदतीने बहिणीला मानसिक आजारी ठरवत इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तर वृद्ध आईला कारमधून वृद्धाश्रमात नेऊन सोडले. याप्रकरणात स्थानिकांनी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी 9 दिवस कारवाई केली नाही.
16 जुलै रोजी एका नागरिकाने आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवताच त्यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. वरिष्ठांनी तपासात बाऊन्सरच्या मदतीने जबरदस्ती झाल्याचे उघड झाल्यावर आयुक्तांनी निरीक्षक उल्हास कदम यांना प्रश्न विचारले, परंतु त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यानंतर आयुक्त अमितेश कुमार यांनी कदम यांच्या बदलीचे आदेश दिले.
महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल. "असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.