नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कांदा भावाचा प्रश्न पेटला असून, आज मंगळवारी संतप्त झालेल्या शेतकर्यांनी कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कांदे फेकले, तसेच कांदा-भाकरी खाऊन आंदोलन करीत सरकार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने कांदा भावाचा प्रश्न हा चिघळत चाललेला आहे. त्यामुळे आता शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यातच नाफेड आणि इतर संस्थांमार्फत होणारी कांदा खरेदीदेखील पुरेसा भाव देत नसल्यामुळे शेतकर्यांना उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्यामुळेच शेतकर्यांच्या संतापाचा आता उद्रेक होऊ लागला आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर काय निर्णय होईल, हे आता सांगणेदेखील अवघड आहे.
काद्याला हमीभाव, चाळीत खराब होणार्या कांद्याला विमा संरक्षण आणि निर्यातीला अनुदान या मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शेकडो शेतकर्यांनी कार्यालयात धडक देऊन जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी हे प्रशिक्षणासाठी गेले असल्यामुळे शेतकर्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडत निषेध नोंदवला.
या दरम्यान शेतकर्यांनी हातात आणलेले कांदे फोडत कांद्याला भाव द्या, नाहीतर सरकारचा भाव घ्या,अशा घोषणा दिल्या.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे आंदोलकांना नेले जात असतानादेखील शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर कांदे फोडले. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला.
त्यानंतर आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी दालनाबाहेर बसून कांदा पोळी, कांदा भाकरी आणि कांद्याची भाजी खात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सांगितले, की कांदा सडतोय; पण आम्हाला काहीही मदत मिळत नाही. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणार्यांची संख्या वाढत आहे. या सगळ्याचे उत्तर सरकारकडे आहे का? असा सवाल त्यांनी केला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; मात्र शेतकर्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. आंदोलनाचे नेतृत्व दीपक पगार, प्रवीण अहिरे, विठ्ठल महाजन बाबासाहेब चौधरी यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.