'केंद्राचे धोरण, शेतकऱ्याचे मरण', नाशिकच्या शेतकऱ्याने व्यंगचित्रातून साधला सरकारवर निशाणा
'केंद्राचे धोरण, शेतकऱ्याचे मरण', नाशिकच्या शेतकऱ्याने व्यंगचित्रातून साधला सरकारवर निशाणा
img
Dipali Ghadwaje
नाशिक : केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात मूल्य आकारल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागलेले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहे . अशातच नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकरी असलेल्या किरण मोरे या व्यंगचित्रकाराने आपल्या कलेतून केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण अधोरेखित केले आहे.
 
तरुण शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटून शेतकऱ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी साकारलेल्या व्यंग चित्रात कांदा उत्पादक शेतकरी प्रगतीची वाटचाल करत असतांना त्याच्या पायात बेडी अडकवून त्या बेडीची साखळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे ओढत असल्याचे व्यंगचित्र रेखाटले आहे. 

व्यंगचित्रकार मोरे यांनी काढलेले हे व्यंग चित्र सध्या शेतकरी संघटनांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्यंगचित्राबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेली एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये 'नवीन हिटलरशाही - शेतकऱ्यांचे मरण' टोमॅटोचे भाव पाडून झाल्यावर कांद्याचे भाव पाडण्यासाठी केलेल्या तातडीच्या प्रयत्नांबद्दल मोदी सरकारचे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार असे उपरोधिक आभार शेतकऱ्यांकडून मानण्यात आले आहे..
 
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीचाच विचार केला तर 96 लाख 25 हजार 838 क्विंटल वर्षभरात आवक असते, तर 9 अब्ज वीस कोटी, 49 लाख 63 हजार 978 इतकी या बाजार समितीची उलाढाल असते. यावरून लक्षात येते की लाखो शेतकऱ्यांचा उत्पादन हा कांदा असून आज मात्र लासलगाव बाजार समितीसह इतर 15 बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेला असून व्यापारीने देखील शेतकऱ्याच्या हिताचं धोरण लक्षात घेता आज संपूर्ण बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहे. 

दरम्यान निफाड, देवळा, सटाणा भागात शेतकऱ्यांनी एकत्र आंदोलन देखील केल्याचे समोर आले  आहे. यारून अनेक शेती तज्ञानी देखील शेतकऱ्यांवर अन्याय करणार निर्णय असल्याचे सांगितले. यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांचा जीवावर उठणारा असून याच पार्श्वभूमीवर सटाणा तालुक्यातील एका शेतकरी तरुणाने व्यंगचित्राच्या माध्यमातून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 'नवीन हिटलरशाही - शेतकऱ्यांचे मरण' अशा आशयाची पोस्ट सध्या सर्वत्र  व्हायरल होत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group