नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड येथील वास्को हॉटेलसमोर बुधवारी रात्री एका युवकावर झालेल्या अत्यंत थरारक आणि प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे.
या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने नाशिककरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. वाढत्या गुन्हेगारीच्या या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा गुरुवारी सायंकाळी नाशिकरोडच्या रस्त्यावर उतरला. पोलिसांनी परिसरात जोरदार 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ७० हून अधिक टवाळखोरांवर धडक कारवाई केली.
बुधवारी रात्री वास्को हॉटेलसमोरील चौकात पूर्ववैमनस्यातून किंवा किरकोळ वादातून एका युवकावर धारदार शस्त्रास्त्रांनी क्षणार्धात जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका भीषण होता की, परिसर रक्ताने माखला. या थरारक घटनेचे चित्रण शेजारील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्याने कायद्याच्या सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये 'दहशतीचे' वातावरण आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी आणि व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिसांचे विशेष पथक गुरुवारी रात्रीच रस्त्यावर उतरले.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, कोरडे, आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्यासह तब्बल १५ अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने संपूर्ण नाशिकरोड परिसरात रात्रीचा दिवस केला.
पोलिसांनी गुरुवारी रात्री नाशिकरोड परिसरातील सर्व संशयित कट्टे, हॉटेल्स आणि चौकांमध्ये रात्रभर जोरदार 'कॉम्बिंग ऑपरेशन' (सर्च मोहीम) राबवले. यावेळी परिसरात विनाकारण फिरणारे, भाईगिरी करणारे आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या तब्बल ७० हून अधिक टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या या सर्व टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायदा कलम ११२ आणि ११७ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी रात्रीच त्यांची चांगलीच 'शाळा' घेतली.
...तर गाठ आमच्याशी आहे: पोलिसांचा कडक इशारा
हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. "शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या गुंडांची गय केली जाणार नाही," असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नाशिककरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.