...तर सांगेन आमचं ठरलंय जा! नारायण राणेंचा महायुतीला टोला
...तर सांगेन आमचं ठरलंय जा! नारायण राणेंचा महायुतीला टोला
img
दैनिक भ्रमर
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी अनेक मतदारसंघात महायुतीने उमेदवार जाहीर केले असून, काही मतदारसंघात तिढा कायम आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच, हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशात, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महायुतीच्या नेत्यांवर उघड नाराजी व्यक्त करत खडेबोल सूनावले आहेत. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याच प्रचारादरम्यान नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नारायण राणे यांनी महायुतीच्या नेतेमंडळीवर नाराजी व्यक्त केली. "एका व्यक्तीच्या सांगण्याने काही होत नाही. अवघड ते सोप करण्याची ताकद आमच्यात आहे. महायुतीच्या पुढाऱ्यांनी अपशकून करू नये. मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे. या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करता यावी. आपला देश तिसऱ्या क्रमांकावर यावा. अमेरिका, चीन आणि त्यानंतर भारत असावा, त्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून मोदींना संधी देण्यात यावी. यंदा मोदींची हॅटट्रीक होणार आहे. 400 जागाही येणार आहेत. 400 जागांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा खासदार असणार आहे", असे नारायण राणे म्हणाले.

याशिवाय, "ज्यांच्याकडे काही नाही, असे लोक मोदींवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभरात कौतुक होतं आहे. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे. अनेक महापुरुष झाले. पण मोदी महान आहेत. खासदार झालो तर अभिमान वाटेल असं काम करेन. अर्थव्यवस्थेची जाण असलेला माणूस आपला पंतप्रधान आहे. लोकांना फक्त हे देऊ ते देऊ सांगणारे राहुल गांधी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत का? दोन दिवसांत पुन्हा येतो. तुम्ही मला बोलवलं तरीही आणि नाही बोलवलं तरी प्रचारासाठी येईन. नुसतं दाढी वाढवून यात्रा करत मोदींवर टीका करत आहेत. कोकणात विद्यापीठे नाहीत, मोठे उद्योगधंदे नाहीत. निवडणूक झाली की दोन महिन्यात सगळे प्रश्न सोडवून दाखवेन", असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group