भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३ पैकी ३ सामने जिंकून सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील तिसरा सामना पाकिस्तानविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तर पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एका लाईव्ह कार्यक्रमात बोलताना शाहिद आफ्रिदी हा बाबर आझम, शादाब खान आणि शाहिन आफ्रिदीसारख्या संघातील प्रमुख खेळाडूंवर गरजला. पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझम, शादाब खान आणि शाहिन आफ्रिदीबद्दल बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, “गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय, यांना सातत्याने संधी दिली जात आहे. हे वरिष्ठ खेळाडू आहेत. त्यामुळे ज्या संघाविरूद्ध यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते, त्या सामन्यात हे फ्लॉप ठरतात. जर यांच्याकडून होत नसेल, तर युवा खेळाडूंना संधी द्या. काय फरक पडेल?”