गेल्या पाच वर्षात
गेल्या पाच वर्षात "इतक्या" भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! कोणत्या देशांना देत आहेत प्राधान्य? वाचा संपूर्ण बातमी
img
Dipali Ghadwaje
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशात येणाऱ्या अवैध स्थलांतरितांना दणका दिल्यानंतर सर्वाधिक झटका भारतीयांना बसला आहे. देश सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचे  जगामध्ये भारतीयांचे सर्वाधिक प्रमाण आहे.

अमेरिकेत सर्वाधिक चर्चेत H1-B व्हिसा सुद्धा सर्वाधिक भारतीयांना मिळतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या बदलत्या प्रशासकीय धोरणांमध्ये सर्वाधिक होरपळ भारतीयांची होणार आहे.

अमेरिकेसह कॅनडासारख्या देशांमध्येही भारतीय मोठ्या प्रमाणात स्थायिक होत आहेत. या देशांत गेलेले भारतीय त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडून देत असल्याचे कारण आहे.

2023 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली होती. गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्याच्या तयारीत आहेत. इमिग्रेशन धोरण कठोर करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय आपला देश का सोडत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात वाढ होण्याचे कारण काय? 

भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत?

भारतीय नागरिकत्व सोडण्यामागे अनेक मोठी कारणे आहेत. यामध्ये परदेशातील चांगला पगार आणि चांगले वातावरण, भारताच्या तुलनेत परदेशातील उच्च शिक्षणाचा स्तर, देशातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, धार्मिक उन्माद, व्यवसायाच्या संधींचा अभाव यांचा समावेश होतो. याशिवाय, भारतातील एकल नागरिकत्वाची तरतूद आणि दुहेरी नागरिकत्व नसणे हेही महत्त्वाचे कारण आहे.

भारतीय नागरिकत्व सोडून अधिक कुठे स्थायिक होत आहेत?

भारतीय नागरिकत्व सोडून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, जर्मनी, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, पेरू, नायजेरिया, झांबिया या देशांमध्ये स्थायिक होत आहेत. काही भारतीय नागरिकत्व सोडून पाकिस्तान आणि चीनमध्ये सुद्धा स्थायिक होत आहेत.

दरवर्षी सुमारे दीड लाख भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत. भारतीय नागरिकत्व सोडून या लोकांनी 135 देशांचे नागरिकत्व घेतले आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारखे मोठे देश आणि थायलंड, मलेशिया, पेरू, नायजेरिया आणि झांबिया सारखे छोटे देश देखील समाविष्ट आहेत. यातील बहुतांश लोकांनी नोकरीमुळे भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारे सरासरी 44 टक्के भारतीय नागरिकत्व सोडतात. त्याच वेळी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या 33 टक्के भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अमेरिकेत गेलेले 44 टक्के भारतीय नंतर नागरिकत्व घेतात आणि तिथेच स्थायिक होतात.

त्याच वेळी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला जाणारे 33 टक्के भारतीय देखील असेच करतात. त्याचप्रमाणे ब्रिटन, सौदी अरेबिया, कुवेत, यूएई, कतार, सिंगापूर या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक स्थायिक होत आहेत.

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये 1,63,370 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. संसदेत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजात या लोकांनी वैयक्तिक कारणांसाठी नागरिकत्व सोडल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन नागरिकत्वासाठी सर्वाधिक 78,284 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. यानंतर 23,533 लोकांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आणि 21,597 लोकांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतले. चीनमध्ये राहणाऱ्या 300 लोकांनी तेथील नागरिकत्व घेतले आणि 41 जणांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले.

सन 2020 मध्ये नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 85,256 होती आणि 2019 मध्ये 144,017 लोकांनी नागरिकत्व सोडले. 2019 पासून तब्बल साडे आठ लाख भारतीयांनी देशाला रामराम केला आहे. 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group