राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे परखडपणे आपले विचार मांडत असतात. आताही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्याला शिवसेना का सोडावी लागली? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्यात का दरी निर्माण झाली, यावर जाहीर भाष्य केलं. तसेच ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना यावर बोलताना देखील त्यांनी परखड शब्दात आपलं मत मांडलं आहे.
वसंत व्याख्यानमालेत बोलताना भुजबळांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असूनही त्यांना शिवसेना का सोडावी लागली हे देखील सांगितले.
ते म्हणाले, सगळ्या जाती त्यांच्या उद्योग-धंद्यावरून पडल्या आहेत. पण आजपर्यंत, जेव्हा जेव्हा ओबीसीला काही देण्याची वेळ आली किंवा ठरलं, तर हे कोर्टात जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीही ओबीसी कमिटी स्थापन केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसी आरक्षणाची मागणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भुजबळ म्हणाले की, देशात जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा देसाई यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेताना थेट आयोग स्थापन करण्यास सांगितलं. त्याचा अहवाल १९८० मध्ये आला होता, त्यात ओबीसी समुदायाला आरक्षणाची आवश्यकता असल्याचे म्हटलं होतं. पण काँग्रेसच्या राजवटीत हा अहवाल दाबून ठेवण्यात आल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.
व्ही.पी. सिंग आल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा आयोगाचा अहवाल स्वीकारला. यानंतर मी पण मग ओबीसी आरक्षणाबद्दल थेट बोलू लागलो. त्यावेळी मी शिवसेनेत होतो.
मात्र, तरीही आम्ही आरक्षणाचा आग्रह लावून धरला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह नाशिकला येत असतं. ते इथं राहतही होते. मी ओबीसी आरक्षणाबाबतच्या मोर्चात असताना बाळासाहेब माझ्या घरी प्रेस घेत होते. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंनी ओबीसी आरक्षणाचा विषय हा पुढे आणायचा नाही, असं मला सांगितलं. आणि तिथूनच आम्हा दोघांमधील नात्यांमध्ये दरी होण्यास सुरूवात झाल्याचा गौप्यस्फोट भुजबळानी केला.