गावातील टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीची आत्महत्या
गावातील टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje

सिन्नर : गावातील टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यात घडली. वैष्णवी नवनाथ जाधव (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये वैष्णवी जाधव इयत्ता दहावीत शिकते. तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.22) मध्यरात्री उघडकीस आला.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन टवाळखोर तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. 
दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणार्‍या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघा तरुणांनी घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट साईट सांगून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या मुलांना समज देऊन जायला सांगितले होते. मात्र हे तीनही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या वैष्णवीने काल रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार मध्यरात्री तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर लक्षात आला. वैष्णवी, तिचा लहान भाऊ योगेश व चुलता घराच्या बैठक खोलीत झोपायचे. तर आई वडील बाजूच्या खोलीत झोपायचे. भाऊ योगेश हा पिठाच्या गिरणीत उशीर झाल्याने तेथेच थांबला होता. वैष्णवी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने जालिंदरने नवनाथ व वहिनी सुनीता यांना उठवले. या सर्वांनी दरवाजा उघडण्यासाठी वैष्णवीला आवाज दिला. मात्र प्रतिसाद येत नसल्याने जालिंदरने पहारीच्या सहाय्याने दरवाजा तोडला. यावेळी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
नातेवाइकांनी वावी पोलीस ठाण्यात कळवत मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. वैष्णवीने आत्महत्या केली त्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे. हे तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते. माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले. शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील या भीतीने मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख या चिठ्ठीत होता.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी सहकार्‍यांसमवेत शहा येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. वैष्णवीने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच तिघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले. आज सकाळी दोडी येथील रुग्णालयात शहा गावातील ग्रामस्थ व तरुणांनी मोठी गर्दी केली होती. चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार केले जातील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी वैभव गोराणे, अंकुश धुळसुंदर व एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. तोपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारात थांबून होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात शहा येथे सायंकाळी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group