मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही : मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही : मनोज जरांगे पाटील
img
दैनिक भ्रमर

 नांदूर शिंगोटे (प्रकाश शेळके) :- मराठा समाजाशी मी कदापी गद्दारी करणार नाही. सर्व मंत्रिमंडळ माझ्या व्यासपीठावर आले होते, परंतु समाजासाठी एक इंच ही माझी नियत ढळू दिली नाही. मी समाजाशी प्रमाणिक आहे, मी खानदानी मराठा आहे. सरकारने माझ्यावर कितीही दबाव टाकले तरी मी उधळूनच लावीन.

सरकार जवळ आता एकच पर्याय उरला आहे सरसकट मराठ्यांना कुणबीचे दाखले देणे व त्यांच्या हक्काचे आरक्षण त्यांना देणे, असे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पांगरी बुद्रुक येथील संवाद दौऱ्याच्या वेळी केले. व्यासपीठावर भाऊसाहेब शिंदे, हरिभाऊ तांबे, दत्ताजी वायचळे, सुभाष कुंभार, प्रा राजाराम मुंगसे, ज्ञानेश्वर पांगारकर, शरद शिंदे, करण गायकर, विलास पांगारकर, ॲड. मयूर पांगारकर, किशोर चव्हाण, नामदेव कोतवाल, ॲड. संजय सोनवणे आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.

सरकारने तीस दिवसांचा कालावधी आमच्याकडून मागून घेतला आहे परंतु आम्ही सरकारला चाळीस दिवसांचा कालावधी दिला आहे. तो कालावधी 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. 14 ऑक्टोबरला अंतरवली येथे मोठा मेळावा होणार आहे सर्व समाजाने अशीच एकजूट ठेवा मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता राहणार नाही. संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही शरीर साथ देत नसले तरी एकजुटीमध्ये फूट पडू देऊ नका. सरसकट मराठ्यांना आरक्षण हे ध्येय ठेवून विजय हा आपलाच होणार असून हा विजय म्हणजे तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांचा असणार आहे.

पांगरी येथे 21 दिवस साखळी उपोषण सुरू असून त्या उपोषणास पालकमंत्री भेट येत नाहीत ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. अशा लोकांना पालकमंत्रीपदी राहण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही सन 1939 मध्ये जी जनगणना ओबीसींची झाली होती त्या जनगणनेनुसार 14% आरक्षण देण्यास सांगितले होते. परंतु व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ओबीसी असलेल्या समाजाला कोणताही पुरावा न मागता सरसकट ओबीसीचे आरक्षण देऊ केले. आम्हाला आरक्षण मिळून देणारे ओबीसी नेते यांच्या मागे मी जर लागलो तर त्यांना सोडणार नाही.

त्यांनी आमच्या वाट्याला येऊ नये. सरकारने चार दिवसांचा कालावधी न घेता तो तीस दिवसांचा घेतला. परंतु चाळीस वर्षे आमची वाया गेली आता तीस दिवस गेल्याने आम्हाला कुठलाही फरक पडत नाही. मी पांगरी येथील शेतकऱ्यांच्या चारा प्रश्न तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून मी तत्काळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. छावा संघटनेचे व या संवाद मिळवण्याचे प्रमुख विलास पांगरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना मी तिसरा मुलगा मानतो.

त्यांनी समाजासाठी स्वतःची जमीन विकली परंतु समाजाच्या लढ्यासाठी ते आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार झाले. किशोर चव्हाण यांनी आरक्षणाचे थोडेफार अडथळे दूर झाले आहे उत्तर महाराष्ट्रातील मराठा समाजाने आपल्या वंशावळी शोधून कुणबी दाखले म्हणून घ्यावेत असे सांगितले. जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या मेळाव्यात तमाम समाजाने आंदोलन उग्र करायचे नाही.   

मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाही तर आरक्षण कुणासाठी मागायचे माता-भगिनींचे संरक्षण करायचे मराठा समाजाला डाग लावू देऊ नका.   तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे हे व्यापिठासमोर बसलेले होते. व्यासपीठावर सर्वपक्षीय कार्यकर्ते दिसून आले. डॉक्टरांनी मला एक किडनी नाही सुरुवातीला सांगितले परंतु नंतर मला दोन्ही किडन्या असल्याचे डॉक्टरांनीच पुन्हा सांगितले असे त्यांनी सांगताच यावेळी एकच हशा पिकला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group