राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता मोठी बातमी समोर येत आहे, प्रतिक्षीत पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली असून येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो. सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी केली आहे. परंतु त्यामध्ये काही अटी अशा आहेत, ज्यांचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम आधी भरावी लागणार आहे, त्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांचा कर्जमाफीचा फायदा होणार आहे.
दरम्यान सरकारने ही अट रद्द करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे, त्यानंतर त्यांनी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन देखील केलं, अखेर तिसऱ्या दिवशी त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यामुळे या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. यावरून विरोधक सरकारच्या कोंडीचा प्रयत्न करू शकतात. त्याचसोबत इरही काही मुद्दे आहेत, ज्यावरून या अधिवेशनात विरोधक आक्रमक होऊ शकतात.