राज्यात सध्या महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असून महिलांचे होणारे कौटुंबिक छळ आणि आणि हुंडाबळी'यासारख्या घटना सातत्याने घडत असून आता पुन्हा एकदा राज्यात एक हुंडाबळी ची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील कुटेवाडी इथून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचाला आणि सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून २३ वर्षीय नवविवाहितेने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता, विवाहितेचा छळ करून तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. पोलिसांनी मृत विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत विवाहितेचे नाव संध्या घुले (वय २३ वर्षे) असे आहे. संध्या हिचा विवाह २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी ४ लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने दिले होते. मात्र, एवढे देऊनही सासरच्यांचे समाधान झाले नाही. लग्नानंतर काही दिवसांतच तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस, असे टोमणे मारत सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.
सासरच्या मंडळींनी गेल्या काही महिन्यांपासून संध्याकडे माहेरहून ऑटो रिक्षा खरेदी करण्यासाठी आणखी २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. सासरच्यांच्या आर्थिक आणि मानसिक जाचाला कंटाळून अखेर संध्याने आत्महत्या केली.
कुटेवाडी येथील एका विहिरीत संध्याचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्यानंतर बीड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या कुटुंबीयांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर सासरच्या मंडळींनी छळ करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पती पवन कुटे, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संध्याचा पती आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून सासू फरार झाली आहे.
सासरच्यांनी माझ्या मुलीचा छळ केला. हुंडा देऊनही त्याच्यामागे पैशांसाठी लागले. २ लाखांसाठी तिला मारहाण केली. मधल्या काळात तीन महिने ती आमच्याकडे राहायला आली. परंतु आता आम्ही कोणताही त्रास देणार नाही, असे म्हणून तिला आमच्या घरून घेऊन गेले. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न... माझ्या मुलीचा खून करून तिला विहिरीत टाकले, असे मृत संध्याच्या वडिलांनी आरोप केला आहे.